जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी)खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लुट रोखण्यासाठी परिवहन आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची तत्परतेने कार्यवाही करा यासाठी सुराज्य अभियानाच्या वतीने, कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.सण, उत्सव, उन्हाळ्याची सुटी, दीपावली या कालावधीत खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सकडून भरमसाठ तिकिटदर आकारून प्रवाशांची आर्थिक लुट चालू आहे. हिंदु जनजागृती समितीने सुराज्य अभियानाच्या अंतर्गत खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लुट रोखली जावी, याविषयी गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री, परिवहनमंत्री, तसेच परिवहन आयुक्त यांच्याकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. प्रवाशांची आर्थिक लुट रोखण्यासाठी परिवहन आयुक्तांनी २५ ऑगस्ट २०२२ या दिवशी याविषयी करावयाच्या कार्यवाहीचे निर्देश सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांना निर्गमित केले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात तत्परतेने कार्यवाही व्हावी, या मागणीचे निवेदन सुराज्य अभियानाच्या वतीने कोल्हापूर येथे साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांना देण्यात आले.
विजय इंगवले यांनी या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.या वेळी हिंदु जनजागृती समितीप्रणित सुराज्य अभियानाचे श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे आणि श्री. शिवानंद स्वामी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.आनंदराव पवळ, भाजप दिव्यांग आघाडी सरचिटणीस श्री. वीरभद्र येडुरे उपस्थित होते.
निवेदनात करण्यात आलेल्या काही मागण्या
१. खाजगी ट्रॅव्हल्स गाड्यांचे बुंकिंग केंद्रे आणि गाड्या सुटणारी ठिकाणे येथे शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार खासगी ट्रॅव्हल्सना अधिकतम किती दर आकारता येईल ? याचा तक्ता दर्शनी भागात लावावा.
२. मोटार वाहन विभाग यांच्या संकेतस्थळावर प्रवाशांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक द्यावा. खासगी ट्रॅव्हल्स आणि बुकींग केंद्रे या ठिकाणीही हा क्रमांक दर्शनी भागात लावण्यात यावा.
३. तिकिटदरात नियमबाह्य वाढ करून प्रवाशांची आर्थिक लूट करणार्या ट्रॅव्हल्सवर सध्या अस्तित्वात असलेल्या नियमानुसार प्रतिबंधात्मक आणि दंडात्मक कारवाई करूनही पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा त्यांच्याकडून झाल्यास भा.दं.वि. कलम ४०६ व ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात यावा.
येत्या उन्हाळ्यात गर्दीच्या काळात पुन्हा अशा प्रकारे दरवाढ करण्यात येऊ नये, याविषयी दक्षता घ्यावी.