जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
गेले काही दिवस 15 जून पासून तळ कोकणात अडकलेल्या मान्सूनच्या वाटचालीस, पुन्हा दिशा मिळाली असून, आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ठिकठिकाणी पावसाचा सरी कोसळल्या आहेत. विदर्भात देखील जोरदारपणे वरूण राजाने हजेरी लावली असून, आता शेतकरी वर्गाला दमदार पावसाची, पेरणीसाठी आवश्यकता आहे मुंबई, पुणे ,नाशिक अलिबाग ,सोलापूरसह मध्य महाराष्ट्रात, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गावडे आंबेरे, मराठवाड्यातील उदगीर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे,आदी ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त आहे .सांगली शहरातही हलक्या स्वरूपाच्या तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे शनिवारी जोरदार पाऊस झाला. मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अरबी समुद्रातून सुद्धा रेंगाळलेल्या मान्सूनला पुढे सरकण्यास पोषक वातावरण तयार झाले असून ,बंगालच्या उपसागरातील मुख्य शाखा देखील बळकट झालेल्या दिसून येत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान देशाच्या पूर्व आणि दक्षिणेकडील राज्यांतील भागात मान्सूनने प्रगती केल्याचे चित्र समोर आले आहे .आज पूर्व विदर्भाच्या काही भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. एकंदरीतच मराठवाडा ,मध्य महाराष्ट्र, कोकणासह इतर ठिकाणी मान्सूनच्या पावसाच्या सरी कोसळल्याने, सर्वत्र आनंदाचे -उल्हासदायक वातावरण निर्माण झाले आहे. मान्सूनच्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत, राज्यातील शेतकरी वर्ग लक्ष ठेवून बसला आहे. मान्सून लांबल्यामुळे खरीप पिकाच्या पेरण्या अजून झालेल्या नसून, दमदार पावसाच्या प्रतीक्षेत सर्वत्र शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.