जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र शासनास आज अखेर जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्ते मनोज जरांगे- पाटील यांना आरक्षण देणेबाबत आश्वस्थ करून,त्यांचे उपोषण मागे घेण्याबाबतीत यश आले आहे.जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन कर्ते मनोज जरांगे-पाटील हे, 29 ऑगस्ट 2023 पासून,मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून उपोषणास बसले होते. 1 सप्टेंबर 2023 रोजी,राज्यात काही ठिकाणी याचे हिंसक पडसाद उमटले होते.आजपर्यंत अनेक वेळा शासनामार्फत वेळोवेळी शिष्टमंडळ पाठवून,तसेच सर्वपक्षीय बैठक घेऊन,तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते.आज अखेर आंदोलन कर्ते मनोज जरांगे- पाटील यांची मनधरणी करण्यात, राज्य सरकारला यश आले असून, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मराठा आरक्षणाची ग्वाही देत,17 दिवशी उपोषण सोडायला लावून,यशस्वी सांगता केली.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी,जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जाऊन,मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन,स्वतःच्या हस्ते फळांचा रस त्यांना देऊन,उपोषणाची सांगता केली.मराठा समाजास कोणत्याही परिस्थितीत आरक्षण देण्यावर सरकार काम असून,ते मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिली आहे.
दरम्यान मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी,आरक्षण मिळेपर्यंत, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा पिच्छा सोडणार नसून,यापुढे साखळी उपोषण मात्र चालूच राहणार असल्याचे सांगितले आहे.दरम्यान आजच्या अंतरवाली सराटी येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याबरोबर त्यांचे सहकारी मंत्री गिरीश महाजन,उदय सामंत,राधाकृष्ण विखे पाटील व नारायण कुचे,अर्जुन खोतकर,आदी मान्यवर उपस्थित होते. उद्या दि. 15 सप्टेंबर 2023 रोजी शासनाने गठीत केलेल्या निवृत्ती न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीची,पहिलीच बैठक होत असून,मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखले देता येतील का? याबद्दल अभ्यासात्मक विचार होईल असे वाटते.