जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
आझादी का अमृत महोत्सवांतर्गत माझी माती माझा देश या उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरावर “अमृत कलश यात्रा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला असून कार्यक्रमासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा सह आयुक्त व सहा.आयुक्त, नगरपालिका प्रशासन शाखा, १३ नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, नगरपरिषद कर्मचारी, नेहरू युवा केंद्रामधील युवक व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी नगरपालिका प्रशासन शाखा, नगरपरिषद मुख्याधिकारी व कर्मचारी वेगवेगळ्या रंगाच्या पोशाखात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याधिकारी गडहिंग्लज नगरपरिषद स्वरूप खारगे यांनी केले व महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत गायन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील १३ नगरपरिषद व नगरपंचायत यांनी आपले स्तरावर घराघरांतून संकलित केलेली माती व तांदूळ एकत्रित करुन अमृत कलश तयार केलेले होते. १३ कलश दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये संबंधित मुख्याधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायत यांनी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांचेकडे सुपूर्द केले.
त्यानंतर ८X८ इंच तांब्याचा कलशामध्ये १३ कलश मधील मुठभर माती घेउन जिल्हाधिकारी, श्री.रेखावार यांचे हस्ते जिल्हास्तरावरील एक अमृत कलश तयार केला व जिल्हा सह आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांनी उपस्थितांना पंचप्राण शपथ दिली.
अमृत कलश दि.२७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये व दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रधानमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी पाठविण्याकरिता नेहरु युवा केंद्रामार्फत २ स्वयंसेवक व १ जिल्हा समन्वयक यांची निवड केलेली आहे.