जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
श्री.क्षेत्र गाणगापूर म्हणजे श्री.दत्तात्रेय द्वितीय अवतार श्री.गुरु नृसिंह सरस्वती महाराज यांच्या पदस्पर्शाने पुण्यभूमी असलेल्या,श्री.क्षेत्र गाणगापूर ची माहिती देत आहोत.नामधारकाने श्रीगुरुंनी विचारले गाणगापुर क्षेत्राचे काय माहात्म्य आहे " नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारलास.मी त्याचे उत्तर देतो.
एकदा अश्विन वद्य चतुर्दशीच्या दिवशी दिवाळीचा पर्वकाल होता. त्यावेळी श्रीगुरु शिष्यांना म्हणाले, "गया-प्रयाग-वाराणसी या त्रिस्थळी स्नान करणे पुण्यकारक असते,तेव्हा आपण सर्वजण यात्रेला जाऊ या. "अरे, तयारी कसली करता? सगळी तीर्थे तर आपल्या गावाजवळच आहेत.त्यासाठी तयारी करण्याची काहीच गरज नाही.तुम्ही माझ्याबरोबर चला.मी तुम्हाला सर्व तीर्थे दाखवितो." असे सांगून श्रीगुरू सर्व शिष्यांना बरोबर घेऊन भीमा-अमरजा संगमावर गेले.तेथे सर्वांनी स्नान केले.त्यावेळी श्रीगुरू सर्व शिष्यांना म्हणाले," या संगमाचे माहात्म्य फार मोठे आहे.येथे स्नान केले असता,प्रयागस्नानाचे पुण्य लाभते.येथे भीमा नदी उत्तरवाहिनी असल्याने ती गंगेपेक्षा अधिक पवित्र आहे. येथे अष्टतीर्थे आहेत.त्यामुळे येथे आले असता काशीक्षेत्रापेक्षा शतपट पुण्यलाभ होतो."श्रीगुरुंनी सांगितलेले हे रहस्य ऐकून सर्व शिष्यांना मोठा आनंद झाला., "स्वामी, 'अमरजा' नदीविषयी आम्हाला सविस्तर सांगा. तिला 'अमरजा' असे नाव का मिळाले हे जाणून घेण्याची आम्हाला इच्छा आहे.
" श्रीगुरू म्हणाले, " जालंधर पुराणात या नदीच्या उत्पत्तीची कथा आली आहे.पूर्वी जालंधर नावाच्या अत्यंत बलाढ्य दैत्याने देवांशी युद्ध करून त्यांना देशोधडीला लावले. त्याने त्रैलोक्य पादाक्रांत केले. त्याने इंद्राशी युद्ध करून स्वर्गलोकही जिंकला. त्या जालंधराच्या सैन्येतील जे दैत्य जखमी होत असत, त्या दैत्यांच्या रक्ताच्या थेंबातून अनेक दैत्य निर्माण होत असत.त्यामुळे युद्धात त्याला जिंकणे अशक्य झाले.त्यामुळे काळजीत पडलेला इंद्र शंकरांस शरण गेला. त्यांना त्याने सर्व परिस्थिती सांगितली इंद्राने असे सांगताच अत्यंत क्रुद्ध झालेल्या शंकरांनी रौद्ररूप धारण केले आणि ते दैत्यांचा वध करण्यास उद्युक्त झाले.त्यांनी अमृतमंत्राने अभिमंत्रित केलेला एक जलकुंभ इंद्राला दिला.शंकरांनी जालंधराचा पराभव केला.इंद्राने घटातील मंत्रोक्त जल देवगणांवर शिंपडून त्यांना पुन्हा जिवंत केले.त्या जलकुंभातील थोडेसे जल पृथ्वीवर पडले.ते ज्या ठिकाणी पडले,तेथे एक नदी उत्पन्न झाली.ती संजीवनी देणारी नदी म्हणून प्रसिद्ध झाली.तिलाच 'अमरजा' असे म्हणतात.या नदीत जे स्नान करतात.त्यांना कोणत्याही रोगाची बाधा होत नाही.ब्रह्महत्यादी महापातके नाहीशी होतात.या अमृतनदीचा भीमानदीशी संगम झाला आहे.तो संगम प्रयागातील त्रिवेणीसंगमासमान आहे.
कार्तिक-माघ महिन्यात या संगमात स्नान केले असता, इहलोकांत सर्व सुखांचा लाभ होतो व अंती मोक्षप्राप्ती होते. सोमवारी, सूर्यग्रहणाच्या दिवशी,संक्रातीला,सोमवती अमावास्येला तसेच एकादशीच्या दिवशी स्नान केले असता अनंत पुण्याचा लाभ होतो. या पर्वदिवशी जमले नाही तर अन्य कोणत्याही दिवशी येथे स्नान केले असता सर्व दोष नाहीसे होतात.ऐश्वर्ययुक्त दीर्घायुष्य लाभते.या संगमाजवळच अश्वत्थवृक्षासमोर नदीच्या तीरावर 'मनोरथ' नावाचे तीर्थ आहे.त्या तीर्थात स्नान केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात.ती अश्वत्थवृक्षासमान आहे, तेथेच माझे नित्य वास्तव्य असते. तेथे 'गरुडपक्षी' दिसतात ही त्याची खूण आहे.जे लोक त्या अश्वत्थाची सेवा करतात त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात.प्रथम अश्वत्थाची पूजा करावी व नंतर शिवमंदिरात जावे.तेथे त्रिनयनीं संगमेश्वर आहे.त्याची भक्तिभावाने पूजा करावी.श्रीशैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुनाप्रमाणेच हा संगमावरील रुद्र आहे.त्याला भक्तिपूर्वक प्रदक्षिणा घालावी.तेथील नंदीला वंदन करून चंडीला वंदन करावे. पुन्हा नंदीला सव्य प्रदक्षिणा घालून सोमसूत्रास जावे.अशा तीन प्रदक्षिणा घालाव्यात मग नंदीमागे उभे राहून शिवदर्शन घ्यावे.असे केल्याने सर्वप्रकारचे वैभव व पुत्रपौत्रांदिचा लाभ होतो.
त्यानंतर नागेशी गावी जावे. तेथे 'वाराणसी' नावाचे तीर्थ आहे.त्या नागेशी गावात भारद्वाज गोत्रातील एक ब्राह्मण होता.त्याने सर्वसंगपरित्याग केलेला होता.तो सदैव शिवध्यान करीत असे. त्याच्या भक्तीने भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले होते.त्याला सतत समोर साक्षात शंकर दिसत असत.त्याला 'ईश्वर' आणि 'पांडुरंगेश्वर' नावाचे दोन भाऊ होते.एकदा ते सर्व तयारी करून काशीयात्रेला निघाले.तें दोघेही त्या वेड्यालाही 'आमच्याबरोबर काशीयात्रेला चल' असे म्हणू लागले.तेव्हा तो शिवभक्त ब्राह्मण त्यांना म्हणाला, " तुम्ही काशीला कशाला जाता ? तो काशीविश्वनाथ माझ्याजवळ आहे.मी तुम्हाला तो दाखवीन." "आम्हाला तो काशीविश्वनाथ दाखव.तो येथेच दिसणार असेल तर त्याच्या दर्शनासाठी इतक्या दूर जाण्याचा त्रास तरी वाचेल." असे त्याचे भाऊ म्हणाले.त्याचवेळी तो ब्राह्मण नदीत स्नान करून शिवध्यान करीत बसला.त्याचक्षणी प्रत्यक्ष शंकर त्याच्यापुढे प्रकट झाले.तेव्हा तो ब्राह्मण शंकरांना म्हणाला, "भगवंता, आम्हाला येथेच आपले नित्यदर्शन व्हावे,अशी माझी तुला प्रार्थना आहे.
" भोळा चक्रवर्ती सदाशिव त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन 'तथास्तु' असे म्हणाला.त्याचक्षणी तेथे मणिकर्णिका तीर्थ उत्पन्न झाले. काशीविश्वनाथाची मूर्तीही प्रकट झाली.ती नदीच्या उत्तरदिशेला आहे.भीमा-अमरजा संगमावर काशीप्रमाणेच मंदिर व कुंड प्रकट झाले.त्या कुंडातून विश्वेश्वराची मूर्ती प्रकट झाली.भीमा-अमरजा काशीप्रमाणेच मंदिराची व कुंडाची रचना झाली.काशीतील सर्व खाणाखुणा लोकांना दिसू लागल्या.मग तो ब्राह्मण आपल्या दोघा भावांना म्हणाला, "आता यापुढे आपल्या वंशातील कोणासही काशीला जाण्याची गरज नाही.यापुढे तुम्ही काशीयात्रेला म्हणून येथेच गाणगापुरास यावे.
" श्रीगुरुंनी भीमा-अमरजा संगमाचे असे माहात्म्य सांगितले असता शिष्यांची व भक्तांची श्रद्धा वाढली."त्यानंतर श्रीगुरू 'पापविनाशी' तीर्थांकडे गेले.त्या तीर्थात केवळ स्नान केल्याने मनुष्याची सर्व पातके नाहीशी होतात.श्रीगुरुंनी आपल्या शिष्यांना अमरजा नदीच्या तीरावरील कोटीतीर्थ, रुद्रपादतीर्थ, गयातीर्थ, चक्रतीर्थ, कल्लेश्वर देवस्थान अशा आठ तीर्थाचे व पवित्र स्थानांचे माहात्म्य सांगून तेथे स्नान,दान,पूजा आदि कर्में केली असता अनंत पुण्याचा लाभ होतो, सर्व पातके नष्ट होतात व सर्व सुखांचा लाभ होतो हे विस्तारपूर्वक सांगितले. ते ऐकून सर्व शिष्यांची खात्री पटली की, काशी, प्रयाग, गया सर्वकाही येथेच आपल्याजवळ आहे.
अशा प्रकारे अष्टतीर्थे माहात्म्य सांगून श्रीगुरु सर्वांसह मठात परत आले.त्यावेळी मोठी समाराधना करण्यात आली.
गुरु म्हणती शिष्यांसी । महिमा अपार संगमासी । प्रयागसमान परियेसीं । षट्कुळामध्यें स्नान करणें ॥१०॥ विशेष नदी भीमातीर । अमरजासंगम थोर । गंगा यमुना वाहे निर्धार । तीर्थ बरवें परियेसा ॥११॥ विशेषें आपण उत्तरे वाहे । याचें पुण्य अपार आहे । शताधिक पुण्य पाहे । काशीहून परियेसा ॥१२॥ आणिक अष्ट तीर्थें असती । तयांचा महिमा विख्यात जगतीं । सांगेन ऐका एकचित्तीं । श्रीगुरु म्हणती शिष्यांसी ॥१३॥ (अ॥ ४८॥)
कार्तिकादि माघमासीं । स्नान करिती भक्तींसी । इह सौख्य परलोकासी । मोक्षस्थाना पावती ॥३०॥ (अ॥ ४८ ॥)
सोम-सूर्य-ग्रहणासी । संक्रमण सोम-अमावास्येसी । पुण्यतिथि एकादशीसी । स्नान करावें अनंत पुण्य ॥३१॥ (अ॥ ४८ ॥)
सदरहू माहितीचे शब्दांकन श्रीयुत विश्वनाथ चोरट यांचे असून, श्रीक्षेत्र गाणगापूर संबंधी दत्त भाविकांना माहिती होण्यासाठी,त्यांचे कडून संपादन करून जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.