जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशभरातील 186 आस्थापनावरील निवृत्त कर्मचाऱ्यांनी,या देशातील औद्योगिक व सेवा व्यवसायात महत्वाचे योगदान दिले आहे.सेवानिवृत्तीनंतर त्यांना तुटपुंजे वेतन देऊन,त्यांचे शोषण करणाऱ्या केंद्रातील भाजपा सरकारचे डोके ठिकाणावर नाही.धार्मिक भावना भडकावून गरीबांची पोटं भरत नाहीत.संविधानाने कामगारांना दिलेले हक्क हिरावून घेऊन,भाजपाच्या केंद्र शासनाने त्यांना बुरे दिन आणण्याचे पाप केले आहे.आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी मी पेन्शनर्स असोसिएशनच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. काँग्रेस पक्ष आपल्या बरोबर आहे असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले.सांगली जिल्हा ईपीएस पेन्शनर्स असोसिएशनच्या कलेक्टर ऑफिससमोर धरणे आंदोलनात पाठिंबा जाहीर करताना ते बोलत होते.
असोसिएशनचे सांगली जिल्हाध्यक्ष काॅम्रेड गोपाळ पाटील यांनी प्रास्ताविकात पेन्शनरांच्या व्यथा मांडल्या.कष्टाने देश घडविलेल्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा काँग्रेस सरकारने 2013 मध्ये पी. चिदम्बरम अर्थमंत्री असताना,तत्कालीन श्रममंत्री व राज्यसभेचे विरोधी पक्षनेते,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.मल्लिकार्जुन खर्गे यांनी 186 आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना पेन्शनला पात्र ठरवून,केंद्र शासनातर्फे निर्णय घेतला.आज गेली 11 वर्षे पेन्शन मध्ये वाढ नाही.महागाई प्रचंड वाढली आहे.तुटपुंज्या पेन्शनवर पेन्शनर्सचे जगणे मुश्किल झाले आहे.त्यांना किमान मासिक रु.9000 निवृत्तीवेतन दिले पाहिजे.
पृथ्वीराज पुढे म्हणाले,'मी पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने ही बाब खा.खर्गे यांच्या समोर मांडली.तातडीने केंद्रीय श्रममंत्री ना.भूपेंद्र यादव यांना,ना.खर्गे यांनी पेन्शनरांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पत्र दिले आहे.सेवाकाळात कर्मचाऱ्यांनी भरलेल्या फंडांवरील आलेल्या व्याजाच्या 25%रक्कम पेन्शनसाठी वापरुन,भांडवलदारांच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये,गरिब कामगारांचा पैसा गुंतवून, त्यांचे शोषण व पिळवणूक करणाऱ्या भाजपा सरकारचे डोके ठिकाणावर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही.
केंद्रातील भाजपा सरकारने पेन्शन निर्णयाची मोडतोड करून,तुटपुंजे पेन्शन केले.काँग्रेस केंद्रात सत्तेवर येताच, पेन्शनर्स असोसिएशनच्या मागण्या मान्य करण्यासाठी उचित पाऊल उचलले जाईल.इंडीया आघाडीच्या लोकसभा निवडणुक जाहिरनाम्यात पेन्शन वाढीचा विषय समाविष्ट करण्याचे खा.खर्गे यांनी मान्य करुन तशी तजवीज केली आहे.प्रमुख मागण्या मध्ये किमान दरमहा रु.9000 पेन्शन, पेन्शनमध्ये महागाई भत्ता लागू करणे,निवृतीवेळच्या शेवटच्या एक महिन्याच्या वेतनावर आधारीत पूर्ण पेन्शन हक्क देणे,ईपीएस 95 चा निधी शेअर बाजारात गुंतवू नये यांचा समावेश आहे.
आभार अशोक कुरणे यांनी मानले.यावेळी असोसिएशनचे सांगली जिल्हाध्यक्ष काॅम्रेड गोपाळ पाटील,प्रा. एन.डी.बिरनाळे,महादेव देशिंगे,भाऊसाहेब यादव अशोक कदम,भगवान शिंदे,प्रकाश पाटील बबन चिकोडी,पंढरीनाथ माने,दिलीप सगरे,बाजीराव साळुंखे,चंद्रकांत घोरपडे, श्री तोडकर व मठपती,विजय व दिपक कांबळे,सदाशिव खोकडे शरद कुलकर्णी,काका भगत,अशोक कुरणे व सांगली जिल्ह्य़ातील 186 विविध आस्थापनेतून निवृत्त झालेले सर्व तालुक्यातील सेवानिवृत्त कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.